दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील
करंजी, सोनवळा, हळद वाढवणा, जिरगा, जंगमवाडी, डोंगरकोनाळी, गुत्ती १,२, धोंडेवाडी, वांजरवाडा, सिंदगी, माळहिप्परगा, रावणकोळा, डोंगरगाव, शेलदरा हे साठवण तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तालुक्यातील जवळपास दीडशे पाझर तलाव असून ते भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
घोणसी गटात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या भागातील नदी, नाले वाहू लागले आहेत. पाझर, साठवण तलाव भरले असून नदीला पूर आला आहे. या पावसाचा २२ गावांना फटका बसला आहे. अतनूरपासून वाहणाऱ्या नदीचे पाणी गावात घुसल्याने घराघरांत पाणी होते. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
तसेच अतनूर, रावणकोळा, मेवापूर, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, फकरुतांडा, सांगवी, गव्हाण, सुल्लाळी, डोंगरगाव आदी परिसरातील वाडी तांड्यावर पाणीच पाणी झाले होते. जवळपास ५०० एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वांजरवाडा परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, उमाकांत इंगळे, अनिल ढोबळे, पांडुरंग परीट, दत्ता इंदुरे, अभंग मोरे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ अधिकारी व्ही.एस. सूर्यवाड, तलाठी तानाजी भंडारे यांनी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली.
ओला दुष्काळ जाहीर करा...
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा. कर्जमाफी द्यावी. हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी आणि जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, तालुक्यातील मोठ्या प्रकल्पासह पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पूर्णपणे जलसाठा झाल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे.