तालुक्यातील तोंडचिर-तांडा येथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी करीत निवेदने दिली होती. प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम मंजूर होऊन सुरू झाले, परंतु काही नागरिकांनी रस्त्याचे काम अडविले होते. परिणामी, तांड्यावरील नागरिकांनी राज्यमंत्री संजय बनसोडे व प्रशासनाकडे रस्त्याचे काम पूर्ण करून, रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनास तत्काळ रस्ता खुला करून देण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी जागेवर जाऊन तांड्यावरील नागरिक व ज्यांनी रस्ता अडविला होता, त्यांच्यात यशस्वी मध्यस्थी करून, काही वर्षांपासून चालू असलेला वाद संपुष्टात आणला. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. यावेळी सरपंच वसंत जाधव, प्रकाश राठोड, मदनकुमार पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता मुकदम, मंडळाधिकारी गणेश हिवरे, तलाठी अमोल रामशेट्टी यांच्यासह तोंडचिर व तांड्यावरील नागरिक उपस्थित होते.