चाकूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चाकूर तालुक्यात बाधितांच्या संख्येत घट होत आहे. सध्या तालुक्यात एकूण ८१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट ही वेगाने पसरली. याच कालावधीत नागरिकांकडून शासन नियमांकडे दुर्लक्ष राहिले. पहिल्या लाटेवेळी प्रत्येक गावांनी काळजी घेतली होती. परंतु, या लाटेवेळी नियमांचे पालन करण्याकडे उदासीनता दिसून आली. परिणामी, संसर्ग वाढत गेला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून १४ एप्रिल रोजी रात्रीपासून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले. परंतु, सुरुवातीस हे निर्बंध नावालाच ठरत होते. दरम्यान, शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू करीत संचारबंदी केली. याशिवाय, ८ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. याच कालावधीत महसूल, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती प्रशासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू केले.
तालुक्यात १५ एप्रिल ते १० मे या कालावधीत २ हजार १३ कोरोना रुग्ण वाढले. कडक लॉकडाऊनमुळे बाधितांचा आलेख उतरला आहे. तालुक्यात १५ एप्रिल रोजी ८३४ ॲक्टिव्ह रुग्ण होते. ३० एप्रिलेला १ हजार १९१ होते. ८ मे रोजी १ हजार १४ ॲक्टिव्ह रुग्ण होते तर १० मे रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ८१६ पर्यंत पोहोचली आहे.
३० एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६२ होती. १० मे पर्यंत होती. त्यात एकने वाढ होऊन ती ६३ वर पोहोचली आहे. दरम्यान, तालुकाबाह्य ठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. १५ एप्रिल रोजी १५२, ३० एप्रिलला २८५, ८ मे २८४ तर १० मे रोजी २४५ रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या घटत आहे. १५ एप्रिलला ५३७, ३० एप्रिलला ७५८, ८ मे रोजी ६३९ तर १० मे रोजी ४९७ रुग्ण होते.
परिस्थितीनुसार निर्बंध असावेत...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिस्थितीनुसार लॉकडाऊन होणे आवश्यक आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक व्हायला हवी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते कमी करावे. नागरिकांनीही लॉकडाऊननंतर फिजिकल डिस्टन्स पाळावे. मास्कचा वापर करावा.
- मिलिंद महालिंगे, माजी नगराध्यक्ष.
नियमांची कडक अंमलबजावणी...
कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यापारी, मध्यमवर्गीय, मजुरांची आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन असताना नियम कडक करावेत. पुन्हा पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याची गरज नसावी. त्यामुळे कोरोनावर मात करता येईल.
- रूपाली पवार, माजी नगराध्यक्ष.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज...
कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचे जे पालन करीत आहेत, त्यांचे व्यापार बंद आहेत. सध्या कडक अंमलबजावणीमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु, बाजारपेठही चालली पाहिजे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- नारायण बेजगमवार, व्यापारी