नागरसोगा : कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत इंधनाचे दर वाढल्याने शेती मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांचे भावही २०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. सततच्या उत्पन्नामुळे जमिनीचा कस कमी होतो. सध्या सेंद्रिय खताच्या तुटवड्यामुळे शेतीला रासायनिक नत्र, स्फुरद, पालाश या घटकाची गरज भासते. त्यामुळे संतुलित वापर केल्यावर उत्पन्नात वाढ होते. काही दशकांपासून सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खताकडे शेतकरी वळले आहेत. मे महिन्यात शेतकरी शेतीतील मशागतीची कामे आटोपून खते बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत असतात.
कोरोनाच्या संकटामुळे सध्या कृषी सेवा केंद्र बंद आहेत. शेतकरी बाजारात खरेदीसाठी गेला असता १५:१५:१५, १२:३२:१६, १०:२६:२६ आदी रासायनिक मिश्र खताच्या मागे २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच डिझेलचे भाव वाढल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा शेती मशागतीस नांगर, कुळव, मोगडणे, रोटर, सरी आदी कामांच्या दरात ट्रॅक्टर मालकांनी २० ते ३० टक्के वाढ केली आहे. शेती मशागतीचा दर, रासायनिक खतांची भाववाढ व पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणांचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीनच्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शासनाकडून अथवा कंपनीकडून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही.
शेतकऱ्यांपुढे संकट कायम...
कोरोनाच्या संकटामुळे शेतातील भाजीपाला व शेतमालाचे भाव कोसळले आहेत. त्यातच रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खतांचा आवश्यक तेवढाच वापर करणे गरजेचे ठरत आहे. यंदा खत, यंत्रावरील मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे, असे येथील शेतकरी रविशंकर जवादे म्हणाले.
कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे व कमतरता भासत असल्यामुळे आणि डिझेलच्या दरवाढीवर वाहतूक महागली आहे. त्याचा परिणाम रासायनिक खताच्या दरवाढीवर होत असल्याचे वितरक सांगत आहेत, असे दापेगाव येथील कृषी केंद्र चालक सुनील कावळे म्हणाले.