केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देश व समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारे हजारो विद्यार्थी आहेत. या आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी दिवस-रात्र एक करून अभ्यास करीत असतात. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सध्या ४३२ उमेदवार पात्र असून, त्यांना अद्यापर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही. मोठ्या कष्टातून आणि आर्थिक अडचणीला तोंड देत हे उमेदवार आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पात्र ठरलेले आहेत. मात्र त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याने उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विवंचनेतूनच स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडलेली आहे. आगामी काळात आणखी काही उमेदवारांनी हे दुर्देवी पाऊल उचलू नये, याकरिता शासनाने पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकीच्या मुलाखतीही रखडल्या...
२०१८-१९ मध्ये महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षांमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ३४०० उमेदवारांच्या मुलाखती अजून घेतलेल्या नाहीत. हे उमेदवारही मुलाखतीसह नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून, या उमेदवारांच्या मुलाखती तात्काळ ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्यांनाही दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.