लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने कृषी विभाग, विमा कंपनी, तहसील कार्यालय व दत्तक बँकेकडे सादर करता येणार आहेत.
जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ७२ तासात पिकांचे नुकसान विमा कंपनीस कळविणे आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत होती. ही बाब लक्षात घेता, शासनाच्यावतीने नवीन सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तात्काळ देण्यास मदत होणार असून, नुकसानीची आर्थिक मदत मिळण्यास सहकार्य होणार आहे.
फोटो कॅप्शन...
रेणापूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे पिकात पाणी साचले होते. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आधी काय होते दोन पर्याय...
१. पूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करून पीक नुकसानीची माहिती द्यावी लागत होती. अनेकदा टोल फ्री क्रमांक लागत नसल्याने गैरसोय होत होती.
२. शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आता माहिती देणे बंधनकारक आहे. पूर्वी त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नुकसानीचा फोटो आणि अर्जात माहिती भरावी लागत होती.
हे आहेत सहा नवीन पर्याय...
१. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येईल.
२. ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेतही अर्ज कागदपत्रांसह भरता येणार आहे.
३. तहसील कार्यालयातही नुकसानीचा प्रस्ताव दाखल करता येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता गरजेची आहे.
४. विमा कंपनीच्या कार्यालयातही नुकसानीची माहिती अर्जासह शेतकऱ्यांना सादर करता येणार आहे.
५. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अर्ज क्रमांक सांगून नुकसानीची माहिती देता येईल.
६. ही सर्व माहिती ७२ तासात देणे गरजेचे आहे. विमा कंपनीच्या ई-मेलचा पर्यायही उपलब्ध आहे.
पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान...
जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
८२ तासांचा अवधी...
विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायांद्वारे ७२ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या पर्यांयांचा अवलंब करून ७२ तासात अर्ज करावेत.
- संतोष भोसले, विमा कंपनी प्रतिनिधी