उदगीर तालुक्यात मागील काही वर्षापासून सोयाबीन हे खरिपाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेले आहे. कमी पावसावर चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरीसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनाकडे लक्ष देत आहेत. तालुक्यात यावर्षी खरिपाच्या एकूण ६४ हजार हेक्टर पैकी ४४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसाच्या खंडा मुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु अधूनमधून पडणाऱ्या जुलै महिन्यातील पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला मोठा आधार मिळाला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी समाधानी झालेला आहे. मागील वर्षाच्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने व खाद्य तेलाचे दर वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा माल ८ हजार ६०० रुपये क्विंटलच्या दराने विक्री होत असल्याने व निसर्गाने अशीच कृपा ठेवली तर पुढील आठवड्यात सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात राशी सुरु होतील व बाजारात आवक वाढेल अशी आशा व्यापारी करीत आहेत.
ऐन पेरणीच्या वेळी बाजारातुन खाजगी कंपनीचे बियाणे घेऊन पेरावे लागले. १५ जूनला सोयाबीनची पेरणी शेतात केले होती. दीड बॅगमध्ये सोयाबीनचे झालेले आहे. बॅगला १० पोत्याचा उतारा प्राप्त झाला असुन, दर सुद्धा उत्तम मिळाल्याने समाधान आहे. व्यंकट मारुती म्हेत्रे, शेतकरी