जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहेत. ६ लाख ४० हजार हेक्टर उसासह खरीप पिकांचा पेरा होतो. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा साधारणत: ४ लाख २० हजार हेक्टरवर होतो. सन २०२१ मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागामार्फत आतापासूनच करण्यात येत आहे. खताची टंचाई निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. या वर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने जवळपास १ लाख ५८ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली आहे.
या वर्षी ९६.८०० मे. टन मंजूर खतसाठा व गतवर्षीचा ४५ हजार मे. टन शिल्लक खतसाठा असा खरीप हंगामात जवळपास १ लाख ४५ हजार मे. टन खतसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठा किमतीसंदर्भात फलक लावण्याचे निर्देश आहेत. खत खरेदीसाठी आधारकार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
खताबाबत शेतकऱ्यांना तक्रार, अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच चौकशी केली जाईल, असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.