ढोरसांगवी जिरगा या साठवण तलावाच्या वरच्या भागात लहान पाझर तलाव आहेत. वरच्या भागातूनच पाण्याचा स्रोत येतो. वरील पाझर तलाव भरल्याशिवाय या मोठ्या प्रकल्पात पाणी येत नाही. त्यामुळे प्रकल्पात मृतसाठा असून, मोठा पाऊस न झाल्यामुळे हा तलाव कोरडाच राहतो की काय, अशी स्थिती आहे. रब्बी पिकांना या पाण्याचा उपयोग हाेतो; मात्र पाऊसच नसल्याने प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. धामणगाव, जिरगा ढोर सांगवी, येलदरा, सोनवळा, धनगरवाडी, एवरी, कोळनुर, लाळी खुर्द, लाळी बुद्रुक, करंजी, जगळपूर, हावरगा या भागात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे साठवण तलावातील जलसाठा वाढलाच नाही; मात्र गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील मूग, उडीद, सोयाबीनचे पीक पूर्णत: धोक्यात आले आहे.
पंचनामे करून तातडीने मदत करा...
पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, मन्मथअप्पा किडे, सभापती बालाजी दबडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, बालाजी आगलावे, महेश धूळशेटे, शिवानंद देशमुख, खादर लाटेवाले, धनंजय ब्रह्मंना यांनी केली आहे.