कोल्हापूर : महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आॅक्टोबरमध्ये होऊ घातली असल्याने निवडणुकीच्या तोंडावर शहरवासीयांवर करवाढ लादायची नाही, असा निर्धार पालिकेतील सत्तारूढ कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी केल्यामुळे सन २०१५-१६ या नवीन आर्थिक वर्षात शहरवासीयांची करवाढीतून सुटका होणार आहे. औपचारिक निर्णयावर सोमवारी (दि. ९) महापालिका सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी, परवाना विभागाचे कर हे गतवर्षीप्रमाणेच राहतील. फेब्रुवारी महिना उजाडला की, महानगरपालिका प्रशासनाचे विविध विभाग उत्पन्नवाढीकरिता करवाढीचे प्रस्ताव तयार करून आधी स्थायी समितीकडे आणि त्यानंतर महासभेकडे मंजुरीकरिता पाठवितात. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत घरफाळा, पाणीपुरवठा, परवाना, इस्टेट, रुग्णालय, अग्निशामक यासह विविध करांचे दर निश्चितीवर निर्णय घेऊन महासभेने प्रशासनाकडे प्रस्ताव द्यायचे असतात. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा निर्णय दोन्ही सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांनी घेतला. त्यामुळे कार्यालयीन प्रस्तावही तसेच देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या; परंतु परवाना दरात सरासरी दहा टक्क्यांपर्यंत वाढ सुचविली आहे. पाणीपुरवठा विभागाने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. अग्निशमन दलाचा रुग्णवाहिका व शववाहिका यासाठी काही प्रमाणात भाडे आकारण्याचा विचार होता. टेंडर नोंदणी, परवाना नोंदणी अशा जनरल करात साधारणपणे १० ते २० टक्के दरवाढ सुचविण्यात आली आहे; परंतु स्थायी समितीने मागच्या वर्षाप्रमाणेच करांचे दर ठेवावेत, अशी शिफारस करून प्रस्ताव महासभेकडे पाठविले आहेत. सोमवारी महासभा होत आहे. या सभेपुढे सदरचे प्रस्ताव निर्णयाकरिता ठेवले आहेत. (प्रतिनिधी)
करवाढीला बगल देणारे वर्ष
By admin | Updated: February 8, 2015 01:10 IST