कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांसंबधी राज्य सरकारकडून निर्णय होईंपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन तोडू नयेत, अन्यथा गाठ आमच्याशी असेल, असा इशारा वीज बिल वाचवा कृती समितीने बुधवारी ‘महावितरण’ला दिला.
‘महावितरण’चे कर्मचारी घरोघरी जाऊन थकीत वीज बिलांच्या वसुलीचा तगादा लावत आहे. वीज कनेक्शन कट करण्याची धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समितीने ‘महावितरण’चे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा निर्णय होईपर्यंत थांबा, असे सांगितले. यावर निर्मळे यांनीही याबाबत सरकारकडून परवानगी घेतो, असे सांगत आदेश येईपर्यंत कोणाचेही कनेक्शन कट होणार नाहीत, अशी ग्वाही दिली.
यावेळी प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, निवासराव साळोखे, विक्रांत पाटील किणीकर, बाबा पार्टे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब देवकर, महादेव सुतार, जावेद मोमीन, मारुती पाटील उपस्थित होते.
चौकट ०१
बिले थकल्याने महावितरण आर्थिक अडचणीत असल्याने थोडे सहकार्य करा, असे आवाहनही निर्मळे यांनी केले.
यावर प्रताप होगाडे यांनी मार्च ते सप्टेंबर या काळातील बिल सोडून प्रत्येक ग्राहकाचे १ ऑक्टोबरपासून वीज वापराचे वीज बिल तयार करून द्यावे तेथून पुढील वीज बिल आम्ही भरू, अशी भूमिका घेतली.
फोटो ३०१२२०२०-कोल-महावितरण
फोटो ओळ : ‘महावितरण’कडून सुरू असलेल्या वीज बिल वसुलीच्या सक्तीच्या विरोधात बुधवारी वीज बिल कृती समितीने ‘महावितरण’चे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांना निवेदन देऊन वसुली थांबविण्याची मागणी केली.