अमर पाटील - कळंबा शहरालगतची साने गुरुजी, साळोखेनगर, तपोवन, सुर्वेनगर, बोंद्रेनगर, जरगनगर, आर. के. नगर, सुभाषनगर, कळंबा जेल या उपनगरांलगतचा कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव परिसर लोकसंख्या वाढीने विस्तारत आहे. येथील नागरिक पालिकेचे कर वेळेत भरून सहकार्य करतात; परंतु याठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा आहे.लोकप्रतिनिधीही निवडणुकीपुरते विकासकामांचे गाजर जनतेस दाखवितात. केंद्र, राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन एकही प्रकल्प पूर्णत्वाकडे नाही. विकासकामांविषयी पालिकेच्या अनास्थेमुळे नागरी सुविधांचाच बोजवारा उडून विकासाविना उपनगरे आजही भकास बनली आहेत.उपनगरांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना झगडावे लागते. क्षमता असूनही उपनगरांचा विकास ठप्प आहे. त्यासाठी विकासाच्या मास्टर प्लॅनची गरज आहे; पण लोकसहभागही वाढविणे गरजेचे आहे. पाच वर्षांतील विकासाविना भकास उपनगरांची चेहरेपट्टी बदलण्याचे आव्हान नूतन आयुक्त व लोकप्रतिनिधींसमोर आहे.* अकार्यक्षम सिग्नल व्यवस्थावाहनांच्या वाढत्या संख्येने उद्भवणारी रहदारीची समस्या, अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन उपनगरांत सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली; पण बरेच दिवस सिग्नलच बंद. पिकअप शेड, स्पीडब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग पट्टे यांच्या अभावाने अपघात नित्याचेच.अग्मिशमन व आरोग्य केंद्राची वानवामहागड्या आरोग्यसेवेने उपनगरांतील सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. आज पालिका प्राथमिक आरोग्य केंद्राची वानवा आहे. आपत्तीजनक परिस्थितीमध्ये शहरातील अग्निशमन केंद्रावर अवलंबून राहावे लागते. वेळ व संपत्तीचे होणारे नुकसान विचारात घेता उपनगरांत अग्निशमन केंद्र ही काळाची गरज बनल आहे.कोट्यवधीचे पाणीपाणीपुरवठा विभागाने उपनगरांतील बोगस नळकनेक्शनची झाडाझडती घेतल्यास कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाची भर पडू शकते. बांधकाम परवान्यासोबत रेनहॉर्वेस्टिंग परवाना बंधनकारक केल्यास भविष्यात पाणी समस्येची तीव्रता कमी भासणार आहे.शिक्षण, करमणूक,नागरी विकास कधी?आज या उपनगरांत दहावीनंतर उच्च शिक्षणाची सोयच नाही. इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज नाहीत. नाट्यगृह, सिनेमागृह, अद्ययावत हॉस्पिटल, क्रीडांगणे, उद्याने, स्वतंत्र मंडई या नागरी सुविधांची वानवा आहे.ओपन स्पेस अतिक्रमणांच्या विळख्यातउपनगरांतील प्रत्येक प्रभागात पालिका मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या ओपन स्पेसची मांदियाळी. त्यातील बोटांवर मोजण्याइतक्याच विकसित. बऱ्याच पालिका प्रशासनाच्या अनास्थेने पालिकेच्या ताब्यात नाहीत. बेहिशेबी मालमत्ता आरक्षणे उठवून लाटण्याचे प्रताप नवीन नाहीत.कळंबा, रंकाळा तलावास नवसंजीवनी कधी?सांडपाणी, प्रदूषणाने रंकाळा, तर पाणलोट बांधकामांनी गाळाचा उठाव न केल्याने कळंबा तलावाची दुरवस्था. प्रदूषणाने तलावातील आॅक्सिजन कमी होऊन जलचरांचे अस्तित्व नष्ट होत आहे. कळंबा तलाव सुशोभीकरणाची भीमगर्जना वल्गनाच ठरली, तर रंकाळा ‘नवसंजीवनी’ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.५स्मशानभूमी, शववाहिकेविना परवडलाखांवर लोकसंख्या असणारी उपनगरे आजही अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. पालिकेच्या तोकड्या शववाहिकांनी मृतदेहांची हेळसांड नित्याचीच आहे. उपनगरांत ओपन स्पेसची मांदियाळी असली तरी स्वतंत्र स्मशानभूमी विकसित करण्याचे धाडस एकाही लोकप्रतिनिधीने दाखविलेले नाही.
ठोस ‘विकासा’विना उपनगरे ‘अविकसित’...
By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST