जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेली जयसिंंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांतून जात आहे़ शासन स्तरावर बाजार समितीबाबत उदासीनता आहे़ शिवाय निवडणुकीचा खर्च अशा सर्व बाबींचा विचार करता आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ३ जुलैला पंचवार्षिक निवडणूक होत आहे़ एकूण १९ जागांसाठी तब्बल १५३ अर्ज दाखल झाले़ इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्यामागे राजकीय प्रतिष्ठेचेच कारण पुढे आले आहे़ गत निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी झाली होती़ यामध्ये सर्व जागा जिंकून दिवंगत आमदार सा़ रे़ पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली होती़ शासनाच्या धोरणामुळे गेल्या पाच वर्षांतील बाजार समितीचा कारभार पाहता बाजार समितीच्या माध्यमातून म्हणावा तितका मोठा विकास झाला नसल्याचेच दिसून येते़ निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने बाजार समितीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे़ बाजार समिती सध्या अनेक अडचणींतून जात आहे़ शिवाय शासन पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत नाहीत़ अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मात्र राजकीय ईर्ष्या लागली आहे़बाजार समितीचा जुना इतिहास पाहता त्यावेळी राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात ईर्ष्या असायची़ आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बाजार समितीची सध्या निवडणूक लागली, तर सुमारे ८ ते १० लाख रुपये खर्च निवडणुकीवर अपेक्षित आहे़ अशा परिस्थितीत शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़ निवडणूक बिनविरोध झाली, तर खर्च वाचणार आहे़ यामुळे सर्वच थरांतील नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़ राजकीय पक्षांनी एकत्र यावे : गतवैभव हवेसध्या होऊ घातलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सर्व राजकीय पक्षांनी समविचाराने एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करून या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज बनली आहे़
बिनविरोध निवडणूक गरजेची
By admin | Updated: June 10, 2016 00:17 IST