लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण (दि. १५) चांदोली राष्टीय उद्यानअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उखळू ते उदगिरी या २० किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीचा जलसंपदामंत्री जयंत पाटील व आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून जंगल सफारीचा प्रारंभ झाला. वन्यजीव विभाग चांदोली व उखळू ग्रामविकास समितीतर्फे या जंगल सफरीचे आयोजन केले आहे.
शिराळा तालुक्यातील झोळंबी येथे सध्या २१ किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्यातील उखळूपासून उदगिरीपर्यंत ही जंगल सफारी सुरू झाल्याने मणदूरप्रमाणे उखळू येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जंगल सफारीसाठी १६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उपअभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, वनक्षेत्रपाल जी. एच. लंगोटे, वनपाल डी. के. यमगर, एच. ए. गारदी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, उखळूचे सरपंच राजू मुटल, मोहन पाटील, राजू वडाम, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट -
प्रवेश शुल्क १२ वर्षांआतील मुलांना १५ व प्रौढ व्यक्ती प्रति ३० रुपये, १२०० रुपये सफारी वाहन व वाहन प्रवेश शुल्क १०० रुपये, गाइड शुल्क २०० रुपये, शैक्षणिक सहलीसाठी शालेय विद्यार्थी १० व महाविद्यालयीन विद्यार्थी २० रुपये प्रत्येकी शुल्क राहणार आहे. उद्यानात प्रवेश वेळ सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत असून गुरुवारी उद्यान बंद राहील. वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पास मिळणार आहेत.
- १
हे पाहता येणार तांबवे टॉवर, उदगिरी मंदिर,
कोकण दर्शन.
फोटो:
चांदोली राष्टीय उद्यानअंतर्गत उखळू ते उदगिरी या जंगल सफारीचा प्रारंभ करताना जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व आ मानसिंगराव नाईक, वनसंरक्षक समाधान चव्हाण व इतर मान्यवर.