विकास शहा -शिराळा -शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाने माजी आमदार मानसिंगराव नाईक व कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख या दोन भाऊंची आघाडी विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या भाजपला भारी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदारसंघात असो की तालुक्यात, कोणतेही दोन राजकीय गट एकत्र आले की, एकाचा पाडाव नक्की, हे सिद्ध झाले आहे. आता या यशामुळे दोन भाऊंनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीची गाडी धावणार आहे.विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये दोन कॉँग्रेसची म्हणजे दोन भाऊंची एकी होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक यांचा मानसिंगराव नाईक यांनी पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये तिन्ही गट वेगवेगळे लढले. यामध्ये मात्र शिवाजीराव नाईक यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर ही आजची बाजार समितीची पहिली निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अगोदर ही बाजार समिती इस्लामपूरशी संलग्न होती. २००९ मध्ये विभाजन होऊन ही बाजार समिती अस्तित्वात आली. यानंतर पहिली निवडणूक बिनविरोध होऊन कॉँग्रेस आघाडीचीच सत्ता आली. त्यानंतर ही पहिली निवडणूक होती.बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ही निवडणूक बिनविरोधसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. भाजपला दोन जागा देण्याचा प्रस्ताव दोन्ही गटाकडून संमतही झाला. मात्र या दोन जागा कोणत्या, यावर चर्चा फिसकटली. माजी आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) गटाला ११, सत्यजित देशमुख गटाला (काँग्रेस) ८ जागा अशी आघाडी झाली, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाने १९ जागांसाठी ११ उमेदवार उभे केले. त्यामुळे आघाडीचे ८ उमेदवार विजयी होणार हे नक्की होते. सत्ताही आघाडीचीच येणार हेही निश्चित झाले होते.दोन कॉँग्रेसने तसेच भाजपने जोरदार प्रचार केला. प्रत्यक्ष भेटीवर जोर दिला. त्यामुळे ही निवडणूक पक्षाच्या व राजकीय गटांच्या अस्तित्वाची लढाई ठरली होती. कॉँग्रेसने पुढील पाच वर्षात व्यापारवाढ, शीतगृह उभारणी, गोदाम उभारणी, विविध प्रकल्प उभारणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपनेही विकासाचा जाहीरनामा प्रसिध्द केला. या निवडणूक प्रचारात एकमेकांच्या सहकारी संस्थांवर टीका करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मतदार ३१२८ असले तरी, विविध गटातून एकाच व्यक्तीस दोन-तीन विभागात मतदान करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मतदानात १२९ अवैध मतदान झाले. कॉँग्रेस आघाडीस ४६५१, तर भाजपला २१७० म्हणजे कॉँग्रेस आघाडीला ६८ टक्के, तर भाजपला ३२ टक्के मते मिळाली.विधानसभा निवडणुकीत पक्षीय धोरणामुळे आम्हाला स्वतंत्र लढावे लागले, असे देशमुख यांनी सांगितले. मात्र आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही भाऊ एकत्रित उतरणार आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेशही देण्यात आला. त्यामुळे विद्यमान आमदार नाईक यांना म्हणजेच भाजपला रोखण्याची तयारी आतापासूनच कॉँग्रेस आघाडीने सुरू केली आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखही कोकरूड येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे पुढील यापुढच्या निवडणुकांत कॉँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप अशी अस्तित्वाची लढाई होणार आहे. घसरलेली गाडी रूळावर...तालुक्यातील राजकीय समीकरणे नेहमीच बदलत राहिली आहेत. स्थानिक निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नेत्यांची सोयीनुसार भूमिका बदलत राहते. झालेल्या विधानसभेतही हाच प्रकार घडला. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी न झाल्यामुळे तीनही गट स्वतंत्रपणे लढले. परिणामी शिवाजीराव नाईक यांचा विजय झाला. या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसची पर्यायाने मानसिंगभाऊ व सत्यजितभाऊ यांची घसरलेली गाडी अजून सावरली नव्हती. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ती पुन्हा रूळावर आली आहे. आता पुन्हा आघाडी करूनच स्थानिक निवडणुकांमध्ये शिवाजीराव नाईक यांना रोखण्याचा प्रयत्न असेल.
दोघा भाऊंची यारी... ‘साहेबांना’ भारी!
By admin | Updated: August 10, 2015 01:00 IST