कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्क सवलतीचा निर्णय घेतला होता, पहिल्या टप्प्यातील सवलतीचा आज शेवटचा दिवस आहे. १ जानेवारीपासून एक टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी मुद्रांक शुल्क कार्यालयात गर्दी वाढली. सवलत योजनेमुळे बुधवारी शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा जाणविला.
मरगळलेल्या बांधकाम व्यवसायाला पुनश्च: उभारी मिळावी म्हणून ५ टक्के मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम दिसत असून, कोल्हापुरात तर शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यास यश येताना दिसत आहे. २६९ उद्दिष्ट होते, मंगळवारपर्यंत १६० प्रकरणे पूर्ण झाली आहेत.
शासनाने ही सवलत दोन टप्प्यांत लागू केली होती. पहिला टप्पा ३१ डिसेंबरला, तर दुसरा टप्पा ३१ मार्चला संपत आहे. उद्या १ जानेवारीपासून अर्धा टक्का मुद्रांक शुल्क व एलबीटी अर्धा टक्का अशी एक टक्का वाढ होणार आहे. १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क म्हणून आता ४ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ३१ मार्चनंतर पूर्वीप्रमाणेच ५ टक्के मुद्रांक शुल्कासह जिल्हा परिषदेचा एक सेसही आकारला जाणार आहे.
प्रतिक्रिया
लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प राहिल्याचा फटका मुद्रांक शुल्कालाही बसला होता. शासनाने लागू केलेल्या सवलतीचे चांगले परिणाम आले असून, कोल्हापूरने थोड्याच काळात इष्टांकापर्यंत झेप घेतली आहे. मुद्रांक शुल्क नोंदणी फी भरून ठेवा, त्याची मुदत चार महिने असते, पण विनाकारण कार्यालयात गर्दी करू नका.
दिलीप पाटील,
सह. जिल्हा निबंधक
मुद्रांक जिल्हा अधिकारी