कोल्हापूर : ते तीन युवक मूळचे कोल्हापूरचे; पण सध्या ते वेगवेगळ्या शहरांत राहतात; तथापि सामाजिक बांधीलकी मानत त्यांनी कोल्हापुरातील बेरोजगार तरुणांना ७५ हजारांची मदत केली. मात्र त्यांनी याचा कुठेही गवगवा केला नाही. अमेय मिलिंद पोतदार, कुलदीप चंद्रकांत जाधव, शिवराज श्रीराम पचिंद्रे अशी त्या मदत करणाऱ्या युवकांची नावे आहेत.
पोतदार रत्नागिरीत तुरुंगाधिकारी, तर जाधव आणि पचिंद्रे हे उत्तर युरोपातील हेलसिंकी, फिनलंड येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील अडचणीत असलेल्या कुटुंबांना त्यांनी ७५ हजारांची मदत केली. वैयक्तिक पातळीवर आणि कुठेही चित्रात न येता त्यांनी ही मदत केली. कोल्हापुरातील सहृदयी लोकांतर्फे हे अर्थसाहाय्य त्यांनी शहरासह येळवण जुगाई, पन्हाळा तालुक्यातील गरजूंपर्यंत पोहोचविले.