कोल्हापूर : अनुदानपात्र शाळा, वर्गतुकड्यांना अनुदान द्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शिक्षकांनी राज्य शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षण, अर्थमंत्र्यांच्या नावानं चांगभलं,’ असे म्हणत प्रतीकात्मक गोंधळ घालून अभिनव आंदोलन केले. उपोषणकर्त्यांची प्रकृती स्थिर आहे. मागणी मान्यतेचा शासकीय आदेश निघेपर्यंत आंदोलनाद्वारे लढा सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना त्वरित वेतन व अनुदान शासनाकडून मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी बुधवारी शिक्षकांनी शासनाच्या नावानं देवीची प्रतीकात्मक पूजा मांडून गोंधळ घातला. त्याची सुरुवात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास केली. आंदोलनकर्त्या काही शिक्षकांनी गोंधळी व त्यांच्या सहकाऱ्यांसारखा पेहराव करून, संबळ वाजवून गोंधळ घातला. दीड तासाहून अधिक वेळ त्यांचे हे आंदोलन सुरू होते. यात खंडेराव जगदाळे, रामचंद्र कदम, गजानन काटकर, राजू भोरे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राजेंद्र कोरे, मुख्याध्यापक संघाचे एस. एम. पाटील, आर. वाय. पाटील, प्रतापराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती स्थिर असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या मागणीबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे; पण यापूर्वी शासनाने दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे अनुदान देण्याचा शासन आदेश होईपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांचा शासनाच्या नावानं ‘गोंधळ’
By admin | Updated: June 9, 2016 01:23 IST