कोल्हापूर : आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन शिथील केल्यामुळे कोरोना कमी होण्यासाठी शहर आणि जिल्हयातील प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाल्यास आठ दिवसात मिळवलेले एका दिवसात गमवावे लागणार आहे. यामुळे कोरोनामुक्तीसाठी प्रत्येकाची स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी सरकार ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवत आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊनही लागू केला आहे. पण जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी सकाळच्या सत्रात मुभा देण्यात आली आहे. या काळात अनेक ठिकाणी नागरिकांची भाजीपाला, किराणा साहित्य, आदी जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी होते. संचारबंदी असतानाही अनेकजण फुटकळ कारणासाठी संचार करण्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने एकत्र येतात. यातून कोरोनाचा प्रसार वेगाने होतो. वारंवार सूचना करूनही बेशिस्तपणे वागणाऱ्यांची संख्या न घटल्याने आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासन, लोकप्रतिनिधींवर आली. आज (सोमवार)पासून कडक लॉकडाऊन शिथील केल्याने व्यापार, उद्योग सुरू होणार आहेत. कामगार, ग्राहकांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे पुन्हा कोरोनाचा व्यापक फैलाव होण्याचा धोका आहे. आता शहर आणि जिल्ह्यातील रूग्णालयांत व्हेंटिलेटर बेडही शिल्लक नाहीत. कोरोनामुळे व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आल्यास संबंधिताचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणूनच विविध वस्तूंच्या खरेदीच्या मोहापायी कोराेना घरात आणण्याऐवजी प्रत्येकानेच विशेष काळजी घ्यावी, असे मत आरोग्य प्रशासनाचे आहे.
चौकट
मास्क नाही, प्रवेश नाही
प्रत्येक दुकानदारानी मास्क नाही तर प्रवेश नाही, याची कडक अंमलबजावणी करावी. मास्क परिधान करून न येणाऱ्यांना वस्तू देऊ नये. त्यांना दुकानात आणि इतर सार्वजनिक आस्थापनांत प्रवेश देऊ नये, असेही आदेश देण्यात आले आहेत. याच्या प्रबोधनासाठी डिजिटल फलक, भित्तीपत्रकेही ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.
चौकट
लहान मुलांची काळजी घ्यावी
कोरोनाची लागण लहान मुलांमध्येही होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनेक बालकांना याची लागण होत आहे. यामुळे पालकांनी मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवावे, कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने त्यांची कोरोनासंबंधीची तपासणी करून घ्यावी. कोरोनाबाधित कुटुंबातील मुलांचीही तपासणी करणे गरजेचे आहे, असे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोट
कडक लॉकडाऊन उठल्याने कोरोनासंंबंधी सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचारासाठी दाखल व्हावे. बाजारपेठेत गर्दी करू नये.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
हे करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला: मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, बाजारपेठेत गर्दी करू नका, वारंवार हात धुवा.