कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एस. टी. महामंडळाचा खोळंबा आकार आणि किलोमीटरला आकारले जाणारे गाडीभाडे यांची चर्चा सुरू झाली आहे. एस. टी.च्या न परवडणाऱ्या दरामुळे खासगी वाहनांनी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एकमेव पर्याय असलेल्या परिवहन महामंडळाने पंढरपूरप्रमाणेच या यात्रेसाठीही ‘यात्रा विशेष बससेवा’ ही योजना लागू करावी, अशी संघटनांची मागणी आहे. सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा ५ डिसेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून चाळीस ते पन्नास हजार भाविक जातात. पूर्वी एस.टी.चे भाडे आणि खोळंबा आकार कमी असल्याने एस.टी.ने जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गाडीभाडे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर, तर खोळंबा आकार प्रतितास ९८ रुपये इतका करण्यात आला आहे. चार दिवस व तीन रात्री मुक्काम असा कालावधी असल्याने या काळात एस.टी. ५२ ते ५५ तास प्रवाशाविना भाविकांच्या ताब्यात असते. या कालावधीत जो काही दर आकारला जातो त्याला ‘खोळंबा आकार’ म्हणतात. सगळे मिळून एका एस.टी. ला २४ हजार रुपये भाडे द्यावे लागते; पण प्रवास भाड्यापेक्षा खोळंबा आकारच जास्त होतो त्यामुळे हा दर कमी करावा, अशी संघटनांची मागणी आहे. एस.टी.च्या वाढलेल्या दरामुळे एका कुटुंबातील अनेक व्यक्ती यात्रेला जाणार असतील तर त्यांना ते परवडत नाही; त्यामुळे आता खासगी गाड्यांनी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. भागाभागांतील नागरिक यात्रेदिवशीच गाड्या काढून जातात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या यात्रेसाठी एस.टी.च्या २५० ते ३०० गाड्या बुक व्हायच्या. आता ही संख्या १५०वर आली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बेलबाग येथील भाविकांसाठी एस.टी संभाजीनगर आगारातून, तर शाहूपुरी, राजारामपुरी येथील भाविकांसाठी मध्यवर्ती बसस्थानकातून गाड्या सोडल्या जातात. मात्र, पुढच्या वर्षीपासून यात्रा विशेष बससेवा योजना लागू व्हावी यासाठी आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आल्याची माहिती करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेचे उदय पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)गाड्या निघणार तीन तारखेला आता यात्रेला अवघे पाच-सात दिवस राहिल्याने दर कमी करण्यासाठी भांडत बसण्यास वेळ नाही. त्यामुळे महामंडळाच्या ठरलेल्या दराप्रमाणेच एस.टी.चे बुकिंग करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून दीडशेच्या आसपास एस.टी. बसेस रवाना होतात. यासाठी ३ डिसेंबरला मध्यरात्रीपासून गाड्या सौंदत्तीसाठी रवाना होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे सचिव अच्युतराव साळोखे यांनी दिली. या दरवाढीमुळे यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत दर आकारला जातो. यात प्रवास, चहा, नाष्टा आणि जेवणाचा समावेश आहे. एवढा दर आकारूनही संघटना किंवा गाडीप्रमुखांना ते परवडत नाही. मात्र, भाविकांच्या वतीने काहीवेळा महाप्रसादाची, चहाची वगैरे सोय केली जाते; त्यामुळे खर्च कसाबसा भागतो.
एस.टी.महामंडळाचा 'खोळंबाच' जास्त
By admin | Updated: November 25, 2014 23:54 IST