लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आंबेओहोळ, नागनवाडी, काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांना केली. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांबाबत एकत्रित यादी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात तिन्ही प्रकल्पांचा मंत्री मुश्रीफ यांनी आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांनी आपले म्हणणे बैठकीत मांडले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ६५ टक्के रक्कम कपात करण्याची परवानगी देण्यात आली. उर्वरित काही मागण्यांबाबत पुन्हा शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. प्रकल्पग्रस्तांनी सद्य:स्थितीत असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत एकत्रित यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी. याची शहानिशा करून जिल्हाधिकाऱ्यांनी होणारे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावेत. न होणारे प्रश्न शासनाकडे पाठवावेत. त्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रातांधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले, डॉ. संपत खिलारी, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
फोटो ओळी : आंबेओहोळ, नागनवाडी, काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अश्विनी जिरंगे आदी उपस्थित होते. (फोटो-१५०२२०२१-कोल-काळम्मावाडी)