लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन महिन्यात घरांचा ताबा मिळवून दिल्यास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांचा मलाबादे चौकात नागरी सत्कार करू, असे आव्हान नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रमाई आवास योजनेचे काम पूर्ण करण्यासंदर्भात उपनगराध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ठेकेदार कंपनी मे. परेश कन्स्ट्रक्शन, मुंबई यांना पालिकेने तीन वेळा मुदतवाढ देऊनही काम झाले नाही. तसेच शेवटची मुदत संपून चौदा महिने झाले. अद्याप कंपनीचा मुदतवाढीचा अर्ज पालिकेकडे आलेला नाही. असे असताना उपनगराध्यक्षांनी कोणत्या अधिकाराने ठेकेदारास मुदतवाढ दिली? शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दलित समाजाच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, नगरसेवक मदन कारंडे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून दलितांची फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे.