कोल्हापूर : शासन आणि प्रशासनाच्या सूचना व आदेशाची अंमलबजावणी करण्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या, तसेच सहिष्णुतेच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने कोरोना संसर्गाच्या धोका पुन्हा उद्भवू नये म्हणून शुक्रवारी काढण्यात येणारी शिवजयंतीची मिरवणूक ऐनवेळी स्थगित केली. कोरोनासारख्या नैसर्गिक संकटावर मात करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देऊन शिवाजी पेठेने निभावलेल्या सामाजिक कर्तव्याचे पोलीस व जिल्हा प्रशासनाने कौतुक केले.
शिवजयंतीचा उत्साह, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नापेक्षा आम्हाला आमच्या लोकांचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. शिवजयंतीची यंदाची मिरवणूक जरी रद्द केली असली तरी पुढील वर्षी दहापटींनी साजरी करू, असा संकल्प शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवाजी पेठेने नेहमी प्रशासनाच्या हातात हात घालून काम केले आहे, याहीपुढे तसेच काम करू; परंतु प्रशासनानेही पेठेतील कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.
शिवाजी पेठेतील शिवजयंती मिरवणुकीची जय्यत तयारी झाली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीज, बैलगाड्या, चित्ररथ, छत्रपतींचा भव्य पुतळा या मिरवणुकीत आणण्यात येणार होता; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक स्थगित करावी, अशी विनंती पोलीस दलातर्फे करण्यात आली होती. मात्र, तरुण कार्यकर्ते मिरवणूक काढण्यावर ठाम होते. शिवजयंतीचा दिवस उजाडला तरी निर्णय होत नव्हता.
गुरुवारी उभा मारुती चौकात उभारलेल्या भव्य रंगमंचावर शिवजन्मकाळ झाल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, करवीरचे प्रांत वैभव नावडकर, पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण, राजावाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी त्याठिकाणी जाऊन पेठेतील कार्यकर्त्यांना मिरवणूक न काढण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शिवाजी पेठेने मिरवणूक स्थगित केली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा होता.
तेथे कोरोना होत नाही का?
शिवनेरीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती झाली, तेथे कोरोना होणार नाही आणि शिवाजी पेठेत होणार आहे का, याचे स्पष्टीकरण द्यावे, तसेच यापुढील दोन शिवजयंतीवेळी मिरवणुकीस परवानगी दिली जाणार नाही, याची ग्वाही प्रशासनाने द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी केली.
अनेक वर्षांत प्रथमच मिरवणूक रद्द
शिवाजी पेठेतर्फे निघणाऱ्या मिरवणुकीला दीर्घ परंपरा आहे. १९३३ साली शिवाजी तरुण मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी मिरवणुकीची परंपरा सुरू झाली. ही परंपरा अखंडपणे सुरू होती. यंदा मात्र कोरोनामुळे ही परंपरा प्रथमच खंडित झाली.
शिवाजी तरुण मंडळ राज्यातील पहिलेच मंडळ
शासकीय पातळीवर जेव्हा १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय झाला तेव्हा या तारखेला शिवजयंती साजरी करणारे राज्यात पहिलेच मंडळ होते. कै. सखारामबापू खराडे यांनी त्यावेळी शिवाजी पेठेची सहिष्णुता व पुरोगामीत्व दाखवून दिले. आज त्याची पुनरावृत्ती झाल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अजित कोराणे यांनी सांगितले. लालासाहेब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
(फोटो पाठवत आहे)