राजाराम पाटील -इचलकरंजीयेथील नगराध्यक्षपदासाठी असलेले सर्वसाधारण महिला आरक्षण आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेमध्ये विरोधी असलेल्या शहर विकास आघाडीने सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी भरलेला ‘बार’ फुसका ठरला. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील एक गट हाताशी लागत नसल्याने बेरजेच्या राजकारणासाठी टाकलेले फासे उलटले आणि नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेतूनच माघार घेण्याची नामुष्की ‘शविआ’वर आली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकडून कॉँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे पालिकेत कॉँग्रेस आघाडीच्या विरोधात असलेल्या शहर विकास आघाडीमध्ये उत्साह निर्माण झाला. अशा पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यामुळे ‘शविआ’ने सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरू केले.इकडे शहरातील आमराईमध्ये असलेल्या एका फार्महाऊसवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगरपालिकेमधील सध्या सुरू असलेले राजकारण, आगामी विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर कराव्या लागणाऱ्या राजकीय हालचालींचा अंदाज घेण्यात आला. सध्या कॉँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी पाच महिन्यांच्या कालावधीने पाच नगरसेविकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातीलच एक कालावधी राष्ट्रवादी कॉँग्रेसला देण्यात यावा; अन्यथा उपनगराध्यक्षपदासाठी पुढील दहा महिन्यांचा कालावधी मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय कॉँग्रेसकडे करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला.
शविआचा फुसका ‘बार’
By admin | Updated: July 16, 2014 00:58 IST