कोल्हापूर : शाळेत होणाऱ्या आपत्ती टाळल्या जाव्यात, यासाठी तालुकास्तरीय शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू सभागृहात आज, सोमवारी आपत्ती व्यवस्थापन धोके व्यवस्थापन कार्यक्रमार्गंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे तालुकास्तरीय शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.विवेकानंद महाविद्यालयाचे गृहविज्ञान विभागाचे प्रा. यु. आर. हिरकुडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि शालेय पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन केले. जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी अनुभवकथन केले. फिनिक्स डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि शालेय आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ विवेक नायडू, सहाय्यक प्रशिक्षक धनंजय मुरूडकर, राहुल पोखरकर यांनी शालेय सुरक्षा आराखडा, मुख्याध्यापकांची जबाबदारी, प्रथमोपचार, अग्निशमन व उपलब्ध साधनांचा वापर यासंदर्भात मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात अग्निशमन दलाच्या माध्यमातून शोध व सुटका, आपत्कालीन वैद्यकीय रूग्णवाहिका यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. २० डिसेंबरपर्यंत रोज दोन तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वागत व प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. (प्रतिनिधी)
शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST