कोल्हापूर यंदाची वर्षअखेर ही कोरोनाच्या सावटाखाली असून त्यावर विविध नियमांचे बंधन असल्याचे चित्र आहे. परंतु तरीही नागरिकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या परीने जय्यत तयारी सुरू केली आहे.
शासकीय नियमाप्रमाणे रात्री ११ पर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे हॉटेल्सनीही विद्युत रोषणाई केली असून ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. मात्र त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर फिरताना नियमभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
कोल्हापुरात उद्यानांमध्ये रात्री जेवायला जाण्याची पद्धत आहे; पण यंदा ही उद्याने बंद ठेवायची की उघडी याचा काहीच निर्णय झालेला नाही. तसेच उघड्यावर जेवायला जाण्यावरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गच्चीवर आणि घरीच थांबून नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे अनेकांनी बुधवारपासून तयारीला सुरुवात केली आहे. शीतपेयांच्या खरेदीपासून मिसळ, पावभाजी आणि भोजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. वर्षअखेरीच्या निमित्ताने हॉटेल्सनी अनेक आकर्षक पॅकेजीस जाहीर केली आहेत. घरगुती बिर्याणीचीही मागणी वाढली आहे. कोरोनामुळे गेले नऊ महिने हवालदिल झालेल्या नागरिकांना वर्षबदलाची आलेली ही संधी दिलासा देणारी ठरणार आहे.