आमजाई व्हरवडे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून वातावरण ढवळून जात असतानाच या निवडणुकीत जवळचे नातेवाईक एकमेकांविरोधात लढत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने जवळचेच नातेवाईक दुरावत असल्याचे समोर येत आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे नातेवाईक यांच्यात संघर्ष होण्याचा नवीन फंडाच उभा राहिला आहे. कोण भावाच्या विरोधात, तर कोण जाऊबाईच्या विरोधात, तर गावातच असणारे मामा-भाचे, जावई-सासरा अशा लढती पहावयास मिळत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने नातेवाईक दुरावत चालले आहेत.
गेल्या एक महिन्यापूर्वी गळ्यात गळे घालणारे व गुण्यागोविंदाने सहवासात असणारे पै-पाहुणे व भाऊबंद आता एकमेकांना पाण्यात बघत असून एकमेकांविरोधात तीव्र संघर्ष सुरू केला आहे. कोण कुणाच्या घरी जाईनात, सुख-दुःखात भाग घेईनात, लहान मुलांनाही घराचे दरवाजे बंद झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एवढा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
गावात निवडणूक, वाद शेतात
या निवडणुकीत वाद एवढा विकोपाला गेला आहे की, शेतात जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. याचा परिणाम सध्या सुरू असणाऱ्या ऊसतोडणीवर चालू आहे. वाट बंद झाल्याने ऊस वाहतूक कोठून करायची, असा प्रश्न उभा राहिला आहे.