शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, अनेक भागांत नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाशी तातडीने बैठक घेण्यात आली. या वेळी पावसाळ्यापूर्वी पंचगंगा व मजरेवाडी उपसा केंद्रातील अपुरी व दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावीत. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्रुटी, ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर, आदी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करावा. त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना नगराध्यक्षा स्वामी यांनी दिल्या.
पंचगंगा जॅकवेल येथे गेल्या सहा वर्षांपासून गाळ काढला नसल्याने सुमारे १५ फुटांपर्यंत गाळ साचला आहे. त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम असून, नगराध्यक्षांनी याची पाहणी केली. पाण्यामुळे पाईपलाईनखालील माती वाहून जात असल्याने सातत्याने गळती लागत होती. या पाईपलाईनला पूर्णत: काँक्रिटीकरण केले आहे. बैठकीस पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जलअभियंता सुभाष देशपांडे, अभियंता बाजी कांबळे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
३१०५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीतील पंचगंगा जॅकवेलची नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते.