कोल्हापूर : ‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनामुळे करवीर रियासतीचा एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्वाचा दस्तावेज नव्या पिढीला वाचनासाठी उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी बुधवारी येथे केले.
येथील पार्श्व पब्लिकेशनच्या वतीने डॉ. कमलाकर श्रीखंडे लिखित ‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ या ऐतिहासिक ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनावेळी ते बोलत होते. दुसरे शिवाजी यांना प्रदीर्घ कारकीर्द लाभली तरी, त्यांना शेजारील संस्थानांशी चौफेर संघर्ष करावे लागले. त्यातून त्यांना उसंत लाभली नाही. तरीही त्यांनी करवीर संस्थानाचे प्राणपणाने रक्षण केले. इतकी संघर्षशील कारकीर्द आजही दुर्लक्षित राहिली. ती यानिमित्ताने सामोरी येते आहे. या पुस्तकाचे इतिहासप्रेमी नागरिक स्वागत करतील, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी दुसरे यांची कारकीर्द करवीर संस्थानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असूनही दुर्लक्षित राहिली. डॉ. श्रीखंडे यांनी संशोधन करून त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्याचे महत्त्वाचे काम केले. या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनामुळे त्यांचे कार्य नव्याने जनतेसमोर येते आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचे विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी सांगितले. यावेळी वैभवराज राजेभोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पार्श्व पब्लिकेशनचे राहुल मेहता, पारस मेहता, आशिष कुलकर्णी, राहुल भल्ले आदी उपस्थित होते.
फोटो (१५०१२०२१-कोल-विद्यापीठ ग्रंथ प्रकाशन) : कोल्हापुरात बुधवारी 'करवीर छत्रपती दुसरे शिवाजी' ग्रंथाचे पुनर्प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेजारी डावीकडून राहुल भल्ले, आशिष कुलकर्णी, वैभवराज राजेभोसले, अवनिश पाटील, राहुल मेहता, पारस मेहता आदी उपस्थित होते.