कोल्हापूर : आर. के. नगर येथील बलवंतनगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून, सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी केली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले. याबाबत विश्वास शंकर काळसेकर यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विश्वास काळसेकर यांचा शीतपेयाचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री सहकुटुंबीयांसह घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या पहिल्या मजल्याच्या दराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी तिजोरी फोडून त्यातील नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, अंगठी, वाळे, कर्णफुले, रिंगा, तसेच गणपतीसाठी बनवलेली चांदीची आभूषणे असे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरीची फिर्याद काळसेकर यांनी करवीर पोलीस दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण हे करत आहेत.
मुसळधार पावसामुळे चोरट्यांना फावले
रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. हीच संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. मुसळधार पावसामुळे चोरट्यांनी कडीकोयंडा तोडताना वरच्या मजल्यावर झोपलेल्या कोणालाही आवाजही आला नाही. सकाळी हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.