कोल्हापूर : रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेला गारठा... जोरदार संततधार पावसात भिजून चिंब झालेले आंदोलक ... मंत्री, खासदार, आमदार यांनी लावलेली हजेरी... भगवे ध्वज, भगव्या टोप्या परिधान केलेले मराठा स्वयंसेवक आणि चार तासाहून अधिक चाललेल्या मूक आंदोलनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी बुधवारी आणखी एक क्रांतिकारक पाऊल उचलले.
मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण द्यावे या मागणीसाठीची नव्याने आंदोलन सुरुवात होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मूक आंदोलन होणार असून आंदोलनाच्या व्यासपीठावर येऊन मंत्री, खासदार, आमदार यांनी आपली भूमिका मांडायची आहे. मराठा समाजाला कशा प्रकारची मदत करणार याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. राज्यभरात पाच ठिकाणी होणाऱ्या या मुक आंदोलनाला बुधवारी नर्सरी बागेतील राजर्षि शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून सुरवात झाली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाधीस्थळाच्या परिसरात प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समाधी स्थळाकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांकरिता बंद ठेवण्यात आले होते. आंदोलनाच्या ठिकाणी जाणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना केवळ पायी चालत जाण्यास परवानगी होती. समाधीस्थळाच्या परिसरात जाण्यापूर्वी सुरक्षेची परीक्षा देऊनच आत सोडले जात होते. मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जात होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे टेम्परेचर गनद्वारे तापमान तपासले जात होते. त्यानंतर हातावर सॅनिटायझर फवारले जात होते. प्रत्येकांना मास्क असेल तरच प्रवेश दिला जात होता.
आंदोलनस्थळी समाधीच्या सभोवार भगवे ध्वज लावण्यात आले होते. कार्यकर्ते, स्वयंसेवकांनी डोकीवर भगवी टोपी, अंगात काळा सदरा व जीन परिधान केली होती. हाताला काळ्या व भगव्या रिबन बांधल्या होत्या. समाधीस्थळावर मराठा समाजाचे कार्यकर्ते व स्वयंसेवक उजव्या बाजूला तर मंत्री, खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी डाव्या बाजूला हिरवळीवर बसण्याची व्यवस्था केली होती.
मुक आंदोलन सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणार असल्याचे आधी जाहीर केले होते, परंतु प्रत्यक्षात साडे आठ वाजल्यापासूनच कार्यकते, समाज बांधव येण्यास सुरवात झाली. साडेनऊ वाजता तर तेथे बसण्यास जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे अनेकांनी लांब उभे राहूनच आपला सहभाग दर्शविला. सुरुवातीला खासदार संभाजीराजे यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा साक्षात पावसानेही आपली हजेरी लावून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
-मूक आंदोलनामुळे घोषणाबाजीला बगल-
मूक आंदोलन असल्याचे आधीच जाहीर केल्यामुळे चार तासात केवळ एक अपवाद वगळता कोणीही घोषणाबाजी केली नाही. जोरदार पावसातही आंदोलक शिस्तबध्दपणे व शांतपणे बसून होते. लोकप्रतिनिधींची भाषणे ऐकत होते. कुठेही गडबड गोंधळ नव्हता. फक्त एकदाच घोषणा देण्यात आली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले भाषण संपवत असताना ‘एक मराठा ... लाख मराठा’ अशी घोषणा दिली. त्याला प्रतिसाद म्हणून मग मराठा समाजातील कार्यकर्त्यांनीही घोषणा दिली.
-हिरवळीवरच मांडली बैठक-
समाधी स्थळासमोर असलेल्या हिरवळीवर आंदोलनाचे नेते खासदार संभाजीराजे, भारिप बहुजन महाआघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी बैठक मारली. ते पाहून उपस्थित असलेल्या मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी आपल्या खुर्च्या बाजूला सारुन हिरवळीवरच बैठक मारली. त्यानंतर पुढील तीन तास सगळेच खाली बसून राहिले.
- राज परिवाराचा आंदोलनात सहभाग -
खासदार संभाजीराजे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे समाजाचा घटक आणि राज परिवाराचे सदस्य म्हणून छत्रपती घराण्यातील सदस्यांचा सहभाग अपेक्षित होता. त्याप्रमाणे शाहू छत्रपती, युवराज मालोजीराजे, संयोगिताराजे, शहाजीराजे, यशराजे आंदोलनात सहभागी झाले. विशेष म्हणजे त्यांनीही खालीच बैठक मारली. संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे या तर चक्क एखाद्या स्वयंसेवकासारख्या तेथील सर्व व्यवस्था पाहण्यात व्यस्त होत्या. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे गांभिर्याने लक्ष दिले.
-जेवणाची पाकिटे, पाण्याची साेय-
आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्याची तसेच मसाले भाताची सोय संयोजकांनी केली होती. पाण्याच्या बाटल्या तसेच भाताची पाकिटे वाटली जात होती. समाधी स्थळाचा परिसर असल्याने आलेल्या सर्वांनी कोठेही कचरा पडणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे आंदोलन संपताच परिसरही स्वच्छ झाला.
-पार्किंगचे उत्तम नियोजन-
आंदोलनस्थळी अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, फिरते शौचालय याचीही व्यवस्था करण्यात आली होती. पार्किंगची व्यवस्था अतिशय नेटकी ठेवण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर कोठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही.