लोकमत न्यूज नेटवर्क
कबनूर : मराठा आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध करण्यासाठी कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने ऑनलाईन बैठक घेण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व जमावबंदी आदेश लागू असल्याने ही ऑनलाईन बैठक घेण्यात आली.
मराठा आरक्षण रद्द झाले, याला राज्य व केंद्र सरकार दोन्ही जबाबदार आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारांचा जाहीर निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण रद्द होण्यामागे सर्वच राजकीय नेत्यांचा गाफीलपणा कारणीभूत आहे. त्यामुळे विरोधक व सत्ताधाऱ्यांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तोडगा काढावा; अन्यथा मराठा समाजाचा संयम सुटेल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. चर्चेत सचिव युवराज पाटील, सुनील इंगवले, अभिजित खवरे, जीवन यादव, उत्तम यादव, सुनील माने, बाळासाहेब कदम, आनंदा कदम, बाबासाहेब कोकणे, राजाराम वाकरेकर, स्वरूप पाटील, शिवाजी चव्हाण, तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील, विकास फडतारे, दत्तात्रय ढोले, प्रा. विजय निंबाळकर, आदींनी सहभाग घेतला.