कुरुंदवाड : शहरातील पालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नगराध्यक्ष जयराम पाटील फौंडेशनने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत ३९८ अतिक्रमण धारकांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. सर्व प्रस्ताव नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे सादर केले. प्रस्ताव दाखल केल्याने व कामाला गती लागल्याने अतिक्रमणधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन फौंडेशनच्या माध्यमातून अतिक्रमण कायम करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पाटील यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवीत आहेत. दोन दिवसांत शिकलगार वाडा, मोमीन गल्ली, मटण मार्केट परिसर, तबक उद्यान-तळेवाडी, गोठणपूर गल्ली, कोरवी वसाहत, भैरववाडी पूल परिसरातील पाचशेहून अधिक नागरिकांनी प्रस्ताव जमा केले आहेत. त्यातील कागदपत्रांची पूर्तता झालेले ३९८ प्रस्ताव पालिका मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष फारूख जमादार, नगरसेवक दीपक गायकवाड, सुनील चव्हाण, अक्षय आलासे, किरण भोसले, जुबेर म्हतापे उपस्थित होते.
फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०९
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, उपनगराध्यक्ष फारुख जमादार, नगरसेवक दीपक गायकवाड उपस्थित होते.