लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पंधरा गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाली आहे. संरक्षण कठड्याची अनेक ठिकाणी पडझड झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते. संरक्षण कठड्याचे बांधकाम रेंगाळल्याने सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
तुळशी नदीच्या पात्रात सन १९५६ साली या बंधाऱ्याची शेतीच्या पाण्यासाठी उभारणी करण्यात आली होती. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागातील पंधरा गावांच्या परिसरातील वाहतूक सुरू असते. या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतूमध्ये पुराच्या पाण्यात हा बंधारा बुडला जातो. परिणामी पावसाळ्यामध्ये ग्रामीण वाहतूक बंद होते.
गेल्या ६५ वर्षांतील बंधाऱ्याचे बांधकाम जीर्ण होऊ लागले आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागातील काही दगडी बांधकामाचे दगड कोसळू लागले आहेत. बंधाऱ्याचा पश्चिमकडील भरावा अनेक वेळा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रात राज्य शासनाने नव्याने बंधाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी गेली पाच वर्षांपासून जनतेतून होऊ लागली आहे. मात्र, या मागणीकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष होऊ लागले आहे.
फोटो ओळ - आरे ते सावरवाडी (ता. करवीर) दरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.