हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील बालाजी चेन्स कारखान्यात चांदीची साखळी बनविण्यासाठी आलेली सुमारे साडेनऊ लाख रुपये किमतीची साडेसात किलो चांदी घेऊन सहा परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी (दि.१५) दुपारी भरदिवसा पलायन केले. या प्रकरणी कारखान्याचे मालक अमित संभाजी शेटके (रा. यशवंतनगर, हुपरी) यांनी हुपरी पोलिसांत सहा परप्रांतीय कामगारांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. रूपेश, किशोर, नितीन, अरुण, रा. व नंदू (पूर्ण नावे समजून आली नाहीत, सर्व रा. आग्रा, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, चांदी उद्योजक अमित शेटके यांचा यशवंतनगर वसाहतीमध्ये बालाजी चेन्स नावाने चांदीची साखळी बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात आग्रा (उत्तर प्रदेश) येथील कामगार कामांवरती आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने काम अगदीच संथ गतीने सुरू आहे. मंगळवारी दुपारपर्यंत साखळी बनवून घेण्यासाठी कारखान्यात जमा झालेल्या साडेबारा किलो कच्च्या चांदीपैकी ७ किलो ४०० ग्रॅम चांदी घेऊन या कारखान्यातील सात कामगारांनी दुपारी चारच्या सुमाराला पलायन केले. या चांदीची सुमारे नऊ लाख ६० हजार रुपये बाजारभावाप्रमाणे किंमत होते. या कामगारांपैकी आज कोणीही कारखान्यात कामावरती आला नसल्याने मालक अमित शेटके यांचा संशय बळावला. या कामगारांची सर्वत्र शोधाशोध करीत कारखान्यातील कपाटे उघडून त्यांनी चांदीची खात्री करण्याचा प्रयत्न केला असता जमा चांदीपैकी ७ किलो ४०० ग्रॅम चांदी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आज सकाळी याबाबत हुपरी पोलिसांत धाव घेऊन या सात कामगारांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला.