कोल्हापूर : वेगवान वाहतूक, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास होत असल्यामुळे गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ३१३ रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये तब्बल ३३० जणांचे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक अपघातांच्या घटना या ‘अपघातप्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या ८५ जागीच म्हणजे ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी झाल्या आहेत. २०२० या वर्षात या ब्लॅक स्पॉटवर तब्बल शंभराहून अधिक जणांचे बळी गेल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समितीच्या निरीक्षणातून जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित केलेली आहेत. या ‘ब्लॅक स्पॉट’वर दर तीन वर्षांनी अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये रंबलिंग स्ट्रीप बसवणे, दिशादर्शक फलक बसवणे, थर्मोप्लास्टिक रंगाचे पट्टे मारणे, सावधानता फलक, चमकणारे फलक बसवणे, वळण कमी करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी, मयूर पेट्रोलपंप (गोकुळ शिरगाव), सांगली फाटा, नागाव फाटा, वाठार फाटा, किणी टोल नाका, टोप हे ब्लॅक स्पॉट घोषित केले आहेत. त्यापैकी उपाययोजना केल्यानंतर फक्त टोप येथील एकमेव ब्लॅक स्पॉट शिल्लक राहिल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही ३२ ब्लॅक स्पॉट असून उपाययोजनांनंतर ते कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. कोल्हापूर शहरात तब्बल १३ ठिकाणे नोंद आहेत.
शंभरहून अधिक बळी
जिल्ह्यातील सुमारे ८५ ब्लॅक स्पॉट असून गेल्या वर्षभरात या ठिकाणी लहान-मोठे असे सुमारे दोनशेहून अधिक अपघात घडले. त्यामध्ये शंभरहून अधिक जणांचे बळी गेले. राज्य महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवरही मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. विविध उपाययोजनांचे फलक लावूनही त्याकडे दुर्लक्ष करत चालक सुसाट वेगाने वाहने चालवतात, त्यानंतर अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर शक्यतो पहाटेच्या वेळेतच अपघात घडल्याच्या अनेक घटना आहेत.
तालुकानिहाय ब्लॅक स्पॉटची संख्या...
करवीर-४
शिरोळ- २,
हातकणंगले- ६
गगनबावडा- ३
राधानगरी- ५
गडहिंग्लज-४
आजरा -३,
भुदरगड- २,
कागल- ४
पन्हाळा-३
कोल्हापूर शहर-१३
इचलकरंजी शहर-४
जयसिंगपूर शहर- २