कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे ही नियती आणि परमेश्वराचीच इच्छा असावी, या कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासारखा संयमी मुख्यमंत्री नसता तर काय झाले असते माहीत नाही. एवढे चांगले काम करूनही विरोधक टीका करत आहेत, कारण सर्वाधिक आमदार असतानाही आपली सत्ता आली नाही, हे त्यांना अजूनही पटत नाही आणि पचत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी लगावला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनासारखी कठीण स्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी मुंबईत राहून तेथील विकासाची कामे केली आहेत. मेट्रो, पोस्टर शेड अशी कितीतरी कामे मोठ्या गतीने सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामाचे सर्वोच्च न्यायालय, नीती आयोग, पंतप्रधानांनीदेखील कौतुक केले आहे. माध्यमांच्या सर्वेक्षणात आघाडी सरकारने उत्कृष्ट काम केल्याचे म्हटले आहे. काेराेनाचे संकट चांगल्यारीतीने हाताळण्यासाठीच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने एकत्र यावे ही नियतीचीच इच्छा असावी म्हणून आमचे सरकार स्थापन झाले आणि गेल्या दीड वर्षात चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे.
--
तब्येतीच्या चौकशीसाठी भेट
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साेमवारी भेट घेतली यावर ते म्हणाले, पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्यांच्या लहान-मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली आहे.