लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : सुमारे एक हजार पूरग्रस्त कुटुंबांचे योग्य व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. या प्रश्नी मार्ग न निघाल्यास प्रसंगी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पांडुरंग गायकवाड यांनी दिला आहे.
शिरोळ तालुक्यात तीनवेळा महापुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्तांचे प्रश्न मोठे आहेत. या प्रश्नाचे महसूल प्रशासनाला गांभीर्य नाही. पूरग्रस्त ठरलेल्या कुटुंबांचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्यात आलेले नाही. शासकीय गायरान जागेत निवारा करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याचा बडगा दाखवला जातो. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. मात्र, शिरोळ महसूल विभागाकडून पूरग्रस्तांचे अर्ज अपात्र ठरवून निकाली काढण्यात आले आहेत. या प्रश्नी आता शासनाकडेच दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.