सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवायचीच, या ईर्ष्येने बहुसंख्येने अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांपैकी एकही जण शुक्रवारी अर्ज ‘मागे’ घेण्यासाठी ‘पुढे’ आला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १३ दिवस असून, सत्ताधारी राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी इच्छुकांची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी काही अर्जांवर आक्षेप घेऊन त्यांना बाद करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारपर्यंत सुरू होता; पण तो फसला गेला होता. आता २१ जागांसाठी १२८ उमेदवार रिंगणात असून, अर्ज मागे घेण्यासाठी समजुतीच्या मार्गाने चर्चा सुरू झाली आहे. काहीजण प्रलोभने मनात धरून हटूनही बसले आहेत. विशेषत: राष्ट्रवादीतूनच अर्ज दाखल झाले आहेत. त्याव्यतिरिक्त हौसे, नवसे आणि गवश्यांचीही संख्या यात असल्याचं बोललं जातंय.हौशी उमेदवारांना ‘शब्द’ देऊन थोपवायचं, नवस्यांना दहशतीनं मागं सारायचं आणि गवस्यांचं ‘अर्थ’कारण समजून घेऊन त्यांच्याशी बोलणी करायची, याचे अडाखे आखण्याची लगबग सुरू झाली आहे. ‘साम, दाम, दंड’ या नीतीचाही वापर सुरू झाला आहे. दि. २४ पर्यंत ही नीती नेत्यांना वापरावीच लागणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
अर्ज ‘मागे’ घ्यायला एकही ‘पुढे’ येईना!
By admin | Updated: April 10, 2015 23:41 IST