कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मातम मिरवणुकांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. नागरिकांनी घरीच राहून मोहरमचा दुखवटा पाळावा व साधेपणाने सर्व धार्मिक विधी पार पाडावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मोहरमच्या ९ व्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी "कत्ल की रात" तसेच दुसऱ्या दिवशी “योम-ए-आशुरा " येत असून, त्या निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने मिरवणुकीला परवानगी देता येणार नाही. खासगी मातमदेखील नियमांचे पालन करून घरीच करावेत. त्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊ नये. वाझ, मजलीस हे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने करावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---