खा. संजय मंडलिक यांनी वाकरे गावाला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी दिला होता. तो उभारण्यासाठी उत्खनन सुरू असताना चौरस आकाराच्या जांभ्या दगडातील आखीव-रेखीव पूर्व-पश्चिम उताराचा तलावाचा शोध लागला आहे.
या तलावातील शेकडो वर्षांपासून साचत आलेला गाळ काढण्यासाठी सरपंच वसंत तोडकर, ग्रामस्थ, तरुण मंडळे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत पण यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी पोकलेन या मशीनमुळे जांभ्या दगडातील दगडी पायऱ्यांच्या बांधकामाला हानी पोहोचत आहे.
सध्या या तलावातील ३० टक्के गाळ काढण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. हजारो ट्रॉली गाळ काढल्यानंतर आता निधी नसल्याने तलावातील उर्वरित गाळ काढणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले आहे. आतापर्यंत ४ ते ५ लाख रुपये खर्च झाला आहे. या कामासाठी आणखी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने लक्ष घालून हा पौराणिक ठेवा जोपासण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर तरुण मंडळे, ग्रामस्थ व जिल्ह्यातील इतिहासप्रेमींनी लोकचळवळ उभारून हा पौराणिक ठेवा जोपासण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
तलावातील गाळ काढण्यासाठी निधीची गरज आहे. आतापर्यंत ४ ते ५ लाख रुपये खर्च झाले असून गाळ काढण्यासाठी किमान १५ ते २० लाख रुपये आवश्यक आहे. खा. मंडलिक यांनी शासकीय निधी देण्याचे आश्वासन दिले आहे पण निधीबरोबरच इतिहासप्रेमींनी लोकचळवळ उभारून हा पौराणिक ठेवा जिवंत करण्याची गरज आहे. -- वसंत तोडकर (सरपंच)
यंत्रिक साधनांचा वापर केल्याने मोठी हानी होताना दिसत आहे. या ऐवजी जर हा पौराणिक ठेवा जसाच्या तसा सुरक्षित ठेवायचा असेल तर लोकसहभागातून त्याची स्वच्छता करून कमीत कमी हानी पोहचवता येऊ शकते
--
उमाकांत राणिंगा (ज्येष्ठ इतिहास व शिल्प कला अभ्यासक)
फोटो
वाकरेतील पौराणिक तळ्यातील गाळ काढण्याचे काम सर्वच पातळीवर सुरू आहे पण याची कमीत कमी हानी होऊन पूर्वीचे बांधकाम जास्तीत जास्त सुरक्षित राखण्याचे आव्हान ग्रामस्थांपुढे आहे.