कुरुंदवाड : शहरातील प्रमुख रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाले आहेत. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने अपघात होत असताना पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत शहर बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी (दि. २४) आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
शहरातील रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय झाले आहेत. पालिकेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत कोणतीही विकासकामे झाली नाहीत. महावितरण कंपनी, जीओ केबल कंपनीने भूमिगत वाहिनीसाठी शहरातील अंतर्गत रस्त्याची खुदाई केली आहे. कंपन्यांकडून त्याची नुकसानभरपाई नगरपालिकेकडे भरली असताना पालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम केले नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर समिती अध्यक्ष आर्शद बागवान, सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे, बबलू पवार, सिकंदर सारवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.