कोल्हापूर : जिल्ह्यातील ३२ शहरे आणि गावांमध्ये ५०हून अधिक तर ७६ गावांमध्ये २५हून अधिक कोरोनाचे रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे या गावांमध्ये घरोघरी जाऊन स्वॅब संकलन करण्याची मोहीम राबविण्याचा आरोग्य विभागाचा विचार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यातही ग्रामीण भागामध्ये ज्या गावांमध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे, अशाठिकाणी अधिक लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ४०० अशी गावे आहेत की, ज्यामध्ये किमान ५ आणि त्याहून अधिक कोरोना रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे याच गावांमधील रूग्णसंख्या वाढू नये, यासाठी आता आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत गतवर्षी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, ग्राम समित्या आणि प्रभाग समित्यांचे प्रभावी काम आणि यंदा झालेले दुर्लक्ष यावर जोरदार चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना आणि लेखी आदेश काढल्यानंतरही गावपातळीवरील ग्राम समित्या म्हणाव्या तशा सक्रिय झाल्या नाहीत. महापालिकेने कितीही दावा केला तरी अजूनही शहरातील अनेक घरांमधील कोरोना रूग्ण बरे होऊन घराबाहेर पडले तरी गल्लीत माहिती नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत गेली आहे.
चौकट
संस्थात्मक विलगीकरणाच्या केवळ सूचना
गेल्यावर्षी गावाबाहेरून आलेली व्यक्ती सक्तीने शाळेत किंवा शहरामध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवली गेली. शहरांमधील हॉटेलमध्येही तशी व्यवस्था करण्यात आली. परंतु, यंदा महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीचे कुणीच वाईटपणा घ्यायला तयार नसल्याने पुण्या-मुंबईहून आलेले अनेकजण थेट घरातच राहायला गेले. जे पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांचीही बाहेर कुठे नीट सोय होण्याची खात्री नसल्याने ते घरातच राहिले. अशा घरात राहिलेल्या रूग्णांमुळेही कोरोना रग्णसंख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे म्हणणे आहे.
चौकट
गावे आणि सक्रिय रूग्णसंख्या खालीलप्रमाणे
इचलकरंजी ३७३
जयसिंगपूर १९१
उचगाव १५३
कोडोली १३९
पाचगाव १३७
हातकणंगले १०९
कागल ९५
शिरोली ८०
वडणगे ८०
गडहिंग्लज ७४
कुंभोज ७२
उत्तूर ६५
हेर्ले ६३
कळंबा ६३
वडगाव ६०
वाठार ६०
पारगाव ५६
रूकडी ५५
गणेशवाडी ५५
शिये ५५
कबनूर ५२
शिरोळ ५२
कोरोची ५१
कणेरी ५१
उजळाईवाडी ५१
कोट
जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये पाच आणि पाचपेक्षा अधिक रूग्ण आहेत. ७६ गावांमध्ये २५हून अधिक रूग्ण आहेत आणि ३२ शहर, गावांमध्ये ५०हून अधिक रूग्ण आहेत. या मोठ्या गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्या सातत्याने वाढती राहिल्याने आता आरोग्य विभागाने तिकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. घरोघरी जाऊन स्वॅब घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी