कागल : नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेतील ‘सदनिका’ मिळवून देतो, असे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याचे उद्योग काहीजणांकडून सुरू असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे. सध्या या योजनेत एका टप्प्यातील सदनिकांचे वाटप पूर्ण झाले आहे, तर अंतिम बांधकाम सुरू असलेल्या दोन प्रकल्पांमध्ये लवकरच या सदनिका देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर काहीजण एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे दाखवित पाच-पन्नास हजार रुपयांचा व्यवहार करीत आहेत.एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत कागल नगरपरिषदेला ही योजना मंजूर झाली आहे. १००२ ‘सदनिका’ तयार केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात येथील शाहूनगर बेघर वसाहतीजवळ जवळपास ३५० सदनिका देण्यात आल्या आहेत. गणेशनगर आणि वड्डवाडी येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची घरकुले आकारास येत आहेत. अवघ्या ११ रुपयांत २७० स्क्वेअर फुटाची सदनिका मिळणार असल्याने ही योजना खूप चर्चेत आहे. मात्र, यासाठीच्या लाभार्थींची यादी यापूर्वीच मंजूर आहे तरीसुद्धा काहीजण ‘घरकुल’ मिळवून देतो असे सांगून हे व्यवहार करीत आहेत. यासाठी पाच हजारपासून पन्नास हजारापर्यंत घेतले जात आहेत. या प्रकारामुळे नगरपालिका वर्तुळातही खळबळ उडाली आहे. कागल शहरात गेली १५ वर्षे वास्तव्य असणाऱ्या आणि स्वत:चे घर नसणाऱ्या गरजूंना ही सदनिका देता येते, मात्र बोगसगिरी करणारे हे लोक परगावातील व्यक्ती, तसेच घरकुल मिळालेल्यांकडून खरेदी, असे आमिष दाखवून ‘हे व्यवहार’ करीत आहेत. (प्रतिनिधी)‘घरकुल देतो म्हणून काहीजणलोकांची फसवणूक करीत असल्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. मात्र, असे पैसे उकळणाऱ्या या बोगस टोळीच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जर कोणी अशी रक्कम दिली असल्यास नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी अशा लोकांपासून सावध रहावे.-संगीता प्रकाश गाडेकर, नगराध्यक्षा
घरकुलाच्या आमिषाने पैसे उकळण्याचे उद्योग
By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST