आयडिया-व्होडाफोनची गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नेटवर्क सुरळीत करणार असल्याचे एसएमएसद्वारे गाजर दाखवले जात आहे; परंतु नेटवर्क समस्या संपलेली नाही. परिसरात असणाऱ्या कंपनीच्या मुख्य वितरकांकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याचे ग्राहकांच्यातून बोलले जात आहे.
मोबाइल सुविधांमुळे अनेक कामकाज सोपे झाल्यामुळे मोबाइलशिवाय कामकाज पुढे जात नाही. शिवाय झूम मिटिंग, ऑनलाइन शिक्षणप्रणाली यामुळे मोबाइल नेटवर्क सुविधा गरजेची बनली आहे. अशा वेळी मोबाइल सेवा देणाऱ्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यातून फोन लागलाच तर मध्येच बंद होणे, आवाजातील विस्कळीतपणा, तासतासभर फोन लागणे, फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असणे, या प्रमुख कारणांसह मोबाइल सुविधांच्या विस्कळीतपणामुळे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. नेटवर्क समस्यांमुळे ग्राहकांची कंपनी अदलाबदलीमुळे वाढली आहे. याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष करू नये.