कोल्हापूर : लाच प्रकरणानंतर स्वपक्षीयांसोबत काँग्रेस पक्षानेही महापौर तृप्ती माळवी यांच्या विरोधात आघाडी उघडली. जनता बझार प्रकरणात काँग्रेस नेत्यांचा हात अडकल्याची चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न महापौरांनी सुरू केला आहे. जनता बझारचा पुनर्करार करताना प्रशासनाने अनेक गंभीर चुका केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने चौक शी करण्याची सूचना महापौर माळवी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना मंगळवारी पत्राद्वारे केली आहे. त्याची दखल घेत आयुक्तांनी या प्रकरणाची सर्व कागदपत्रे व अहवाल मागविल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जनता बझारप्रश्नी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. करारपत्राचा जनता बझार व्यवस्थापणाने केलेला भंग, पोट भाडेकरू ठेवणे, पूर्णचे बांधकाम परिपूर्ती दाखला (भोगवटा प्रमाणपत्र) न घेणे, मूळ बांधकामात बदल करून तळघर काढणे, स्ट्रक्चर आॅडिट केलेले नाही, भाडेकरारावेळी खुली जागा म्हणून मिळकतीचे वर्णन, त्यामुळे जागेच्या भाड्यात वाढ होऊ शकली नाही. भाडेकरार वाढवून देण्याबाबत महापालिकेचा कोणताही ठराव केलेला नाही. करारामध्ये ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ असा उल्लेख असतानाही कराराचा गैरअर्थ काढला गेला आहे. त्यामुळे राजारामपुरीतील जनता बझार येथे सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून मिळकत ताब्यात घेण्याची कारवाई करावी, असे महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.अर्जाद्वारे देसाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे महापालिका अधिनियमांनुसार तसेच यातील ‘कलम ८ अ’ व ‘८१ ब’प्रमाणे रितसर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी आयुक्तांना केल्या आहेत. माळवी यांनी जनता बझारप्रश्नी लक्ष घातल्याने ‘काँग्रेस विरुद्ध महापौर’ तसेच महाडिकसमर्थक नगरसेवकांतील संघर्ष भविष्यात आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
महापौरांचा काँग्रेसवर पलटवार
By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST