पालकमंत्र्यांनी आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, हिंदूराव चौगले, सदाशिव चरापले यांच्यासह अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राधानगरी धरणाला भेट दिली होती. तेव्हा धरणात २७ टक्के पाणी साठा शिल्लक होता. परंतु अतिवृष्टी झाली तर धरण लवकर भरते आणि पूरस्थिती असतानाही धरणातून पाणी सोडले जाते. परिणाम कोल्हापूर, शिरोळ येथील पूरस्थिती गंभीर बनते. तेव्हा पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी २० टक्केच पाणी साठा शिल्लक ठेवा, अशा सूचना पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. योग्य नियोजन करून धरणातून पाणी सोडण्याचे व्यवस्थापन करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे अशाही स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या.
त्यानुसारच या विभागाने नियोजन केल्याने कोल्हापुरातील वाढलेली पुराची पातळी कमी होण्यास मदत झाली. जर आधी पाणी सोडले नसते तर मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राधानगरी धरणाला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती लवकर नियंत्रणात येण्यासाठी मदत झाल्याचे मानले जाते.