जोतिबा डोंगराच्या चारीही बाजूला गवताची कुरणे आहेत. सध्या दिवसाही वणवे लावण्याचे प्रकार वाढू लागले आहे. चांगले व वाढीव गवत येते या कारणाने मानवनिर्मित वणवे लावले जात आहेत. वणव्यामुळे कडक उन्हाच्या झळा, पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना आता जीवघेण्या झळा बसू लागल्या आहेत. पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.
हिरवागार दिसणारा जोतिबाचा डोंगर आता काळा करपलेला दिसत आहे. जोतिबा डोंगर परिसरात ऑस्ट्रेलिअन सुबाभूळ, लिंब, निलगिरी आदी भरीव वनीकरण केले आहे. झाडांची वाढ ही चांगली झाली आहे. वणव्यांमुळे आता ही झाडे करपली आहेत. दुर्मीळ वनौषधीचा ठेवाही नष्ट होत आहे. वन्यप्राण्यांचीही भटकंती निवाऱ्यासाठी वाढू लागली आहे. वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. लाखो जीवजंतू, कीटक, सरपटणारे प्राणी अनेक पक्षी, त्यांची पिल्लं, अंडी, शेवाळ यांचा नाश होत आहे.
एका बाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत वनीकरणासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना दुसऱ्या बाजूला हे मानवनिर्मित वणवे लावून झाडे लावा आणि तीच झाडे पेटवा, असा अजब प्रकार करीत शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा करीत आहे.
फोटो : १)
मानवनिर्मित वणव्यामुळे भस्मसात झालेला जोतिबा डोंगर परिसर.