कागल : शेतकरीवर्गाला लागलागवड, औषधे, शेतीपूरक साहित्य योग्य किमतीत आणि दर्जेदार मिळावीत यासाठी अडतीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी हा कृषी संघ स्थापन केला. आज बावीस शाखांद्वारे शेतकरीवर्गाला सेवा पुरवली जात आहे. भविष्यात आणखीन शाखाविस्तार करण्यासाठी सज्ज राहूया, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. येथील राममंदिर सभागृहात झालेल्या या सभेस सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील बारा विषयांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली. घाटगे म्हणाले, शाहूू साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या व्यवसाय व्यवहारातून या संघाला आर्थिक स्थैर्य आहेच; पण आता स्वबळावर झेप घेण्यासाठी नवनवीन प्रयोग कार्यकारी संचालक समीर नाळे आणि संचालक मंडळाने राबवावेत. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. प्रास्ताविक उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांनी केले. अहवाल आणि विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. आभार सुनील मगदूम यांनी मानले. संचालक नानासाहेब घाटगे, एकनाथ मगदूम, रामचंद्र वैराट, अरुण शिंत्रे, भाऊसाहेब कांबळे, प्रशांत घोरपडे, प्रकाश पाटील, राजू जाधव, रंजना सातवेकर, विमल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कागल येथील शाहू कृषी संघाच्या ३८ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांचा सत्कार उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.