कोल्हापूर : कोरोना आजार प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून एडी सिरिंजचा पुरवठा केला जातो; पण अलिकडे जिल्हा प्रशासनास त्याचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे स्थानिक आरोग्य प्रशासनास डोस इतके हे सिरिंज मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी लसीकरणावेळी सिरिंजची टंचाई प्रकर्षाने जाणवत आहे.
कोरोना लसीचे डोस सरकारकडून आठवड्यातील तीन दिवस जिल्ह्याला मिळत आहेत. एकावेळी जास्तीत जास्त एक लाखांपर्यंतही डोस मिळाले आहेत. डोस इतके सिरिंज केंद्र सरकारकडून उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शहर, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सिरिंजसाठी धावाधाव करावी लागत आहे. लसीकरणासाठी एडी सिरिंजचा वापर केल्यास कमी वेदना होतात. याउलट इतर स्थानिक बाजारपेठेतून मोठ्या आकाराची सिरिंज खरेदी करून त्याचा वापर केल्यास वेदना अधिक होतात; पण लस मोफत असल्याने कितीही वेदना झाल्या तरी त्या सहन केल्या जातात.
१) काय आहे एडी सिरिंज?
एडी सिरिंजचा वापर एकदाच केला जातो. त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. शरीराला टोचून बाहेर काढल्यानंतर ती लॉक होते. यामुळे सिरिंजचा गैरवापरही करता येत नाही. या सिरिंजचा वापर लहान मुलांच्या लसीकरणासाठी केला जातो. याला एडी सिरिंज असे म्हणतात. इतर सिरिंजप्रमाणे कोणत्याही आकारात ती मिळू शकते.
२) २ सीसी सिरिंज कशी असते?
दोन सीसी सिरिंज म्हणजे २ मिलीमीटर सिरिंज. यामधून दोन मिलीमीटर वेगाने लस शरीरात जावू शकते. याचा वापर कोरोनासह इतर लसीकरणासाठी केला जातो. ही सिरिंज कोणत्याही आकाराची असते.
३) जिल्ह्याला रोज किती लागतात सिरिंज?
कोरोना लसीकरणासाठी शहरात रोज अधिकाधिक चार हजार तर जिल्ह्यात ४० हजार सिरिंज लागतात. दोन महिन्यांपूर्वी लसीचे डोस कमी मिळत होते; पण सध्या आठवड्यातून तीन दिवस लस मिळते. एकावेळी ७० हजार ते लाखांपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने डोस मिळाल्यानंतर लसीकरणावेळी एडी सिरिंजची टंचाई निर्माण होते.
४) वेस्टेज वाढले
एडी सिरिंजचा वापर पुन्हा करता येत नसल्याने त्याचा कचरा होतो. एकदा वापरली की ती टाकून दिली जाते. असे शहर आणि जिल्ह्यात रोज २० ते २५ हजार सिरिंजचा कचरा निर्माण होतो. तो वैद्यकीय घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला दिला जातो.
५) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा कोट
एडी सिरिंजचा पुरवठा केंद्र सरकारकडून होतो. सध्या लसीच्या डोसची संख्या अधिक आणि एडी सिरिंजची संख्या कमी अशी स्थिती आहे. एडी सिरिंज एकदाच वापरावी लागते.
डॉ. फारूक देसाई, जिल्हा लस समन्वय अधिकारी.